Marathi Kavita | Prem Kavita | Virah Kavita | Aayushya Kavita | Charoli | Shayari
मराठी कविता | प्रेम कविता | विरह कविता | आयुष्य कविता | चारोळी | शायरी

माझ्या ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत आहे.
मी लिहिलेल्या कवितांचा पुरेपूर आस्वाद घ्या आणि हो, आपल्या प्रतिक्रिया / comments नक्की द्या.

Saturday, September 17, 2011

एक आठवण...

आपल्या जुलीयेटच्या आठवणींत रमणार्‍या प्रत्येक रोमियोसाठी....

एक आठवण,
तुझ्या-माझ्या सोबतीची.
तुझ्या डोळ्यांत पाहताना,
हरवलेल्या मनाची.
तुझ्या टपोर्‍या डोळ्यांत गुंतवणारी,
एक आठवण...

एक आठवण,
पहिल्या भेटीची.
लाजेने झुकलेल्या,
तुझ्या पापण्यांची.
पुन्हा पुन्हा भेटणारी,
एक आठवण...

एक आठवण,
तुझ्या गोड हसण्याची.
हसताना गालावर पडणार्‍या,
तुझ्या सुंदर खळीची.
नकळत मलाही हसवणारी,
एक आठवण...

एक आठवण,
तुझ्या नजरेची.
जाता जाता वळून देणार्‍या,
त्या मोहक कटाक्षाची.
मग सारखं घायाळ करणारी,
एक आठवण...

एक आठवण,
तुझ्या नाजूक स्पर्शाची.
तुला मिठीत घेताना,
त्या धुंद क्षणांची.
दोघांच्याही मनात विसावलेली,
एक आठवण...




Monday, September 5, 2011

हरवलेल्या वाटा...

आजच्या या स्पर्धा युगात माणसाच्या आयुष्यात भावनांना फार कमी किंमत राहिली आहे. आयुष्याच्या या शर्यतीत बहुतेकांना (प्रत्येकाला) येणारा अनुभव या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


धावता धावता माणूस,
खूप पुढे निघून जातो.
स्पर्धा युगात जगताना,
तो भावनांना मागे ठेवून जातो.

जीवनाच्या चढाओढीत तो,
आपसूकच गुरफटतो.
स्वत:ला सिद्ध करण्यात मात्र ,
स्वतःचे 'मी' पण हरवतो.

जीवनात बर्‍याचदा त्याला,
तड-जोडी कराव्या लागतात.
नको असलेल्या गोष्टी देखील,
गाठीशी बांधाव्या लागतात.

मनाच्या अंधार्‍या कोपर्‍यात,
कुठेतरी-काहीतरी खटकत असतं.
सर्वकाही कळत असतं पण...,
ते कुठेतरी वळत नसतं.

आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर,
शर्यत संपल्याची जाणीव होते.
दोन घटका विश्रांतीसाठी,
मग कोणाचीतरी उणीव भासते.

जुन्या आठवणींचे मेघ,
मग मनात दाटू लागतात.
पुढे जाणारी पावलं,
नकळत मागे वळू लागतात.

ओझरत्या आठवणींसोबत मग,
तो पुन्हा एकदा जगू लागतो.
हरवलेल्या वाटा तो,
पुन्हा एकदा धुंडाळू लागतो.